Home राजकीय आजरा कारखान्याला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्याची ‘धमक’ फक्त आमच्यातच..! : हसन मुश्रीफ(पालकमंत्री)

आजरा कारखान्याला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्याची ‘धमक’ फक्त आमच्यातच..! : हसन मुश्रीफ(पालकमंत्री)

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. हा साखर कारखाना या सगळ्या आर्थिक अडचणींमधून सावरूनच दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची लढाई संपली आहे. आता आजऱ्याचे रणशिंग फुंकले आहे. आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी,आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार विनय कोरे यांनी प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही.

आजरा कारखाना फार मोठ्या अडचणीत आहे, या कारखान्याची आर्थिक घडी विस्कटायची नसेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन बिनविरोध करावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु काही घटना अशा घडल्या की एकमेकांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनल आहे. आजरा कारखाना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक अडचणीतून सावरूनच दाखवू.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, तो परिसर एको सेंसिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तिथे डिस्टीलरी व को- जन उभारण्याला बंदी आहे. ती बंदी काढावी लागेल, त्यासाठी प्रसंगी केंद्रात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटावे लागेल. डिस्टीलरी, इथेनॉल व को-जन हे तिन्ही प्रकल्प केल्याशिवाय तो कारखाना सुरळीत होणार नाही आणि हे करण्याची धमक आमच्यातच आहे.

Related Posts

Leave a Comment