गडहिंग्लज प्रतिनिधी : कागल शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. याचबरोबर मंत्री मश्रीफ यांनी कागल नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची लोक कल्याणकारी शिकवण आणि विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहेत. ही शिकवण आणि विचार निरंतर जिवंत ठेवूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना,महिलांना,युवकांना अशा सर्वच समाजघटकांना आपलं वाटावं असे अठरापगड जातींचे रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले. राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी चालवायचं असतं, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका मुख्याधिकारी अजय पाटणकर,जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने,माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी,माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर,अस्लम मुजावर, अजित कांबळे,संजय चितारी, नितीन दिंडे,विवेक लोटे,इरफान मुजावर,अमित पिष्टे,आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.